बुधवार, सप्टेंबर २०, २००६

माळ्याच्या मळ्यामंदी...

आपल्याला दूध कुठून मिळतं? - पिशवीतून
आपण खातो ते मासे कसे पकडतात?- टी व्ही वर दाखवतात तसे गळ टाकून
भाताच्या वेली असतात की झाडं? ती कशी दिसतात?
हुरडा म्हणजे काय? गूळभेंडी ही भेंडीची गोड जात आहे का?

तुमच्या घरात अशी प्रश्‍नोत्तरे होत असतील तर तुमच्या घराची नाळ गावांपासून शेतीपासून तुटते आहे हे नक्की समजा. तुमच्या मुलांचा अख्खा दिवस शाळा, क्‍लासेस, कार्टूनचे कार्यक्रम, चॉकलेटस्‌ , सॉफ्ट ड्रिंक्‍स, शहरी खेळ यांनी भरलेला असेल तर ती ग्रामीण जीवनाच्या आनंदाला मुकत आहेत, असे नक्कीच तुम्हाला वाटत असेल. वाढत्या शहरीकरणाने आज अनेकांची गावं, गावाकडची घरं दुरावताहेत. ""आमचं अमूक गाव आहे पण आता तिथे कोणीच नाही. वर्षातून एकदा देवीला जाऊन येतो, पण राहणं काही होत नाही.'' अशी खंतही अनेक जण व्यक्त करतात. मग करायचं काय? त्यातल्या त्यात कोणत्या तरी "कॉटेज'मध्ये जाऊन भरपूर पैसे खर्च करून सुट्टी घालवायची हा एक महाग पर्याय असतो. पण अस्सल शेतीची, ग्रामजीवनाची मजा त्यात नाही. दगड मारून कैऱ्या, चिंचा, आवळे खाणे, रानात जाऊन करवंदाच्या जाळीवरून करवंदं तोडून खाणे, ताजं धारोष्ण दूध पिणे, स्वत: पकडलेले मासे खाणे, स्वत: शेतातून काढलेल्या भाज्यांचा आस्वाद घेणं या सर्व गोष्टी आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. पण दुर्मिळ म्हणजे नष्ट झाल्या नाहीत. अजूनही देशातील बासष्ट टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. पण शहरी लोकांचा व शेतकऱ्यांमधला संबंध मात्र दिवसेंदिवस कमी होतोय. आपल्याला हवं असणारं हे वातावरण एखाद्याच्या शेतावर आयतं मिळालं तर? त्यासाठी योग्य ते पैसे मोजण्याची तयारी आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यालाही जास्तीचे उत्पन्न मिळत असेल तर आपल्यालाही आनंदच होईल.

इकडे शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? जगाला खाऊ घालणाऱ्या शेतकरी राजाला समाजात फारशी प्रतिष्ठाही नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळालेली मुलं ऍग्रिकल्चरला जातात आणि कुठे नोकरी न मिळालेला माणूस शेती करतो हे सर्वांच्या मनात अगदी पक्कं बसलेलं. कोणत्याही वस्तूचा उत्पादक तिचा उत्पादन खर्च व नफा पाहून स्वत:च्या वस्तूची किंमत ठरवतो. पण कांदा, टोमॅटो, कापूस व अन्य शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार या शेतकरी राजाला नाही. नातेवाईक, मित्र शहरात राहत असतील तर हक्काने गावाला येऊन शेत ओरबाडून घेऊन जातील. स्क्वेअर फुटात घरं नि कुंड्यांच्या संख्येवर झाडं मोजणाऱ्यांना कितीही लहान शेत असेल तरी ते मोठंच वाटतं. सगळ्या गोष्टी "झाडाला' लागलेल्या दिसत असल्याने त्या फुकट किंवा स्वस्तात नेल्या तरी बिघडतं कुठे? आणि कोणी पैसे द्यायला तयार असेल तर भिडस्त स्वभावाचा शेतकरी ते घेत नाही. म्हणजे एकूणच शेतकऱ्याला पैसे वाजवून घेण्याची सवय नाही.

या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य साधण्याचे प्रयत्न थोड्याफार प्रमाणात विविध प्रकारे झालेही असतील, पण परिस्थिती फारशी बदललेली नाही. अशातच "कृषी पर्यटन' हा एक चांगला पर्याय शहरं व गावांना उत्तमरित्या जोडणारा पर्याय पुढे येतो आहे. शहरी लोकांच्या दृष्टीने शेतावरचं पर्यटन किंवा गावच्या घराचा आनंद घेऱ्यासाठीचं पर्यटन. आणि शेतकऱ्यासाठी नेहमीच्या शेतात अधिक उत्पन्न देणारं पर्यटनाचं नवं आंतरपिक! हे म्हणजे चार कुंड्या टाकून करायचं गार्डन रेस्टॉरंट नव्हे, तर अस्सल शेतीत, शेतघरात राहण्याचा अनुभव. रानवारा कानात भरून मुलांना बागडू द्या, जंगलात जाऊन रानमेवा खाऊ द्या. लहरत्या शेतांच्या पात्यांबरोबर सर्वांचं तनमन बहरू द्या. आंब्याच्या मोहोराने, उभ्या शेताच्या नाकाला सुखावणाऱ्या नैसर्गिक वासाने मोहरू द्या. मागच्या पिढ्यांना मिळालेली शुद्ध हवेची देणगी काही काळ तरी आपण उपभोगू शकतो.

कृषी पर्यटनामुळे जगाचा पोशिंदा शेतकरीही मोठा होणार आहे. आपल्या मालाची किंमत ठरवू शकत नसला तरी किमान इथल्या सेवेची तो किंमत ठरवू शकेल. मात्र त्यासाठी त्याला स्वत:ला, आपल्या शेताला, गडी-माणसांना काही शिस्तही लावावी लागेल. शहरी माणूस हा ग्राहक असल्यामुळे त्याला आवडणाऱ्या गोष्टींची तरतूद मुद्दाम करावी लागेल. यात स्वच्छता पहिली. येतानाच पाहुण्यांना रस्त्यावर घाण, प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा अन्य टाकाऊ वस्तू दिसल्या की पुन्हा येताना तो नक्कीच विचार करेल. त्यासाठी आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घेणं महत्त्वाचं. गावात राहतोय म्हणून, शेतीच्या कामाने खराब होतात म्हणून खराब कपडेही घालणं टाळायला हवं. साधेच पण स्वच्छ कपडे घालून हसतमुखानं केलेलं स्वागत कोणाला आवडणार नाही? म्हणजे वागण्या बोलण्याच्याही चांगल्या सवयी लावून घेणे चांगलेच. गावठी भाषेत सर्रास वापरल्या जाणाऱ्या (दुसऱ्याला दिल्या तरी) शिव्या ऐकायला मिळाल्या तर नव्याने गावात येणारा पाहुणा बिथरूनच जायचा!

कृषी पर्यटनाचे काही विशिष्ट मॉडेल नाही. किंबहुना तसे केले तर त्याची मजाच निघून जाईल. कारण त्या त्या ठिकाणच्या हवेचं, झाडा-पानांचं वैशिष्ट्यं वेगळं. तिथल्या फुलाफळांचा, गावच्या चवीचा, लोककलांचा आस्वाद हा तिथेच घ्यायचा! कोकणचा धुवांधार पाऊस झेलणं असो की सोलापुरातल्या थंडीत शेतावरच्या हुरड्याने ऊब मिळवणं असो; ते जिथलं तिथेच उपभोगायचं. विविध देशांमध्ये काही पारंपरिक तर काही नंतर तयार झालेले कृषी पर्यटनाचे अनेक आयाम पहायला मिळतात. त्यांची कल्पना वापरून आपणही अनेक गोष्टी करू शकतो. जपानमधल्या चेरी ब्लॉसम अनुभवण्याप्रमाणे आंबा काजूचा मोहोर अनुभवता येईल. अन्‌ अमेरिकेतल्या स्ट्रॉबेरी पिकींगप्रमाणे द्राक्षबागेत जाऊन द्राक्षे किंवा करवंदाच्या जाळीत जाऊन करवंदे किंवा जंगलात जाऊन रानमेव्याचा आस्वाद घेणे अशा अनेक गोष्टी आपापल्या ठिकाणी विकसित होऊ शकतात. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र खऱ्या अर्थाने "सुफलाम्‌' झाला आहे. रत्नागिरी देवगडचा आंबा, जळगावची केळी, वसईची सुकेळी, घोलवडचे चिकू, नीरा-फलटणचे अंजीर, नाशिकची द्राक्षे, तासगावचा बेदाणा, नागपुरी संत्रे, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी ही फळं बाजारात बराच काळ राज्य करताहेत. पण सध्या पश्‍चिम महाराष्ट्र, खान्देशात सीताफळे, सोलापूरच्या जवळपासच्या परिसरात डाळिंब, बोरे; मराठवाड्यात केळी, मोसंबी; कोकणात काजू -फणस; पुण्याच्या जवळपास यवत मुळशीकडे पेरूच्या बागा वाढत आहेत. मलेशियात काही ठिकाणी खास फलपर्यटन केले जाते ते महाराष्ट्रात सर्वत्र सहजपणे विकसित करता येईल. लहान थोरांनाही दगड मारू नका, फळे तोडू नका न म्हणता स्वत: काढून (नासधूस न करता) पाहिजे तेवढी फळं खा असं प्रेमळ वाक्‍य ऐकता येईल. याशिवाय हुरड्याच्या पार्ट्या, गुऱ्हाळात गूळ तयार होताना पाहणे व गरम गूळ-काकवी खाणे, स्वत: पकडलेले मासे-कोळंबी खाणे, ड ोळ्यासमोर शेतातून स्वयंपाकघरात जाऊन ताटात येणाऱ्या चविष्ट भाज्या खाणे, तसाच गोठ्यातून चीक स्वयंपाकघरात जाऊन ताटात येणारा गरम खर्वस खाणे, नुकत्याच काढलेल्या भुईमुगाच्या शेंगा भाजून त्याची गोडी अनुभवणे अशा असंख्य गोष्टी शेतावर चाखता येतील. त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना वापरून प्रत्येक शेत हा पाहुण्यांसाठी एक वेगळा अनुभव ठरेल.
याशिवाय झाडांवरचे झोके, मचाण, नदीत-ओढ्यात डुंबण्याचा आनंद, गावातले खेळ, लोककला, जवळपासची जंगलातली सैर, शेतीच्या कामांचा अनुभव घेणं यासारख्या अनेक गोष्टी आनंद द्विगुणीत करू शकतात.
-------------------
कोठे काय?
कोकण- आंबे, काजूची बोंडं, भाजलेले काजू, ओल्या काजूची उसळ, रानातली करवंद, नारळाचे-तांदुळाचे विविध पदार्थ
मराठवाडा- कन्नड तालुका, डोंगरमाथा सीताफळ, पेरू, ज्वारी, बाजरी, मका
खान्देश- केळी, द्राक्षे, सातपुडा सैर
पुणे परिसर- अंजीर, द्राक्षे, पेरू, सीताफळ, ऐतिहासिक ठिकाणे
सोलापूर परिसर- बोर, डाळिंब,
विदर्भ- संत्री, मोसंबी, स्थानिक सुगंधी भातजाती, जंगलातली सैर

------------(published in Sakal- Saptarang)--------------------

1 टिप्पणी:

Janmejay Ambardekar म्हणाले...

छान वाटले वाचुन....सगळा परीसर डोळ्याखालुन गेला...